बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवा शेतकरी अशोक माने यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून कर्जमाफीसाठी जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल. वाचा सविस्तर बातमी.
बीड (मराठवाडा अपडेट 24 ) : “भरणे मामा, तुमचा भाचा तुम्हाला दोन-तीन दिवसांपासून फोन करतोय… जिल्ह्यात पाऊस नाही, मुलांची लग्न होईनात, आमची सरसकट कर्जमाफी करा!” — बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवा शेतकरी अशोक माने यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना थेट फोन करून आपली व्यथा मांडली आहे. या फोन कॉलची रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, बीडमधील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
दुहेरी संकटात सापडले बीडचे शेतकरी
बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणाला सामोरे जात आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर यावर्षी कडक उन्हाळ्याने शेतकरी आधीच हैराण झाला होता. त्यातच यंदा पावसानेही दगा दिल्याने पेरण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. आष्टी परिसरात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.
जून महिन्यात बीड जिल्ह्यात केवळ ५५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ३ लाख ९९ हजार हेक्टरवर ४८.१४ टक्के पेरणी पूर्ण झाली असली, तरी अजून ४ लाख १९ हजार हेक्टरवर पेरणी बाकी आहे. पुरेसा पाऊस न झाल्यास पेरण्या रखडण्याची शक्यता आहे. धारूर, आष्टी, वडवणी, गेवराई आणि माजलगाव या पाच तालुक्यांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
“सरसकट सातबारा कोरा करा”
याच परिस्थितीला कंटाळून अशोक माने या तरुण शेतकऱ्याने थेट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावला. गेल्या तीन दिवसांपासून ते कृषीमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अशोकने केला.
कृषीमंत्र्यांशी बोलताना अशोकने अत्यंत आर्त भाषेत आपली व्यथा मांडली. “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने ज्या जाचक अटी घातल्या आहेत, त्या तातडीने रद्द करा. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करून त्यांना दिलासा द्या,” अशी मागणी त्याने केली.
पावसाअभावी लग्नही होत नाहीत — शेतकऱ्याची हतबलता
बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली आहे. आर्थिक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे देखील कठीण झाले आहे, ही वस्तुस्थिती अशोकने कृषीमंत्र्यांसमोर मांडली.
“पाऊसही नाही आणि मुलांची लग्न सुद्धा होत नाहीत,” — ही त्याची हतबलता ऐकून प्रशासनाने आणि सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्जमाफीच्या अटींवर शेतकऱ्यांचा रोष
दरम्यान, राज्य सरकारने कर्जमाफीसाठी काही अटी ठेवल्या आहेत. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, बीडसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना या अटी पूर्ण करणे अवघड झाले आहे. अशोक माने यांनी या अटी रद्द करण्याची मागणी करताना सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीबाबत घोषणा करण्याचे संकेत दिले होते. तसेच, त्यांनी शेतकऱ्यांसाठी टोल-फ्री क्रमांक (१८००-२३३-४०००) सुरू केला असून, त्याद्वारे शेतकरी तक्रारी नोंदवू शकतात.















