नवी मुंबईतील ऐरोली येथे पत्नी व प्रियकराने पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तीन तुकडे केले. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी 11 महिन्यांनी गुन्ह्याचा पर्दाफाश केला. दोघांना अटक.
हत्याकांड समोर कसे आले ?
मयत बलीराम सूर्यनाथ कुशवाह (वय ५०) हे ऐरोलीतील यादवनगर येथे आपल्या पत्नी व दोन मुलांसह राहत होते. गेल्या काही काळापासून त्यांची पत्नी सुनिता (वय ४०) हिचे घणसोली येथील रिक्षाचालक राहुल दशरथ प्रजापती (वय ३०) याच्याशी अनैतिक संबंध होते. बलीराम यांना या संबंधांबाबत कुणकूण लागताच त्यांनी सुनिताला विरोध केला. त्यामुळे घरात सातत्याने वाद होऊ लागले. या वादामुळे संतापलेल्या सुनिता व राहुलने बलीराम यांना कायमचे मार्गातून दूर करण्याचा कट रचला. ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री बलीराम गाढ झोपेत असताना दोघांनी त्यांचा गळा आवळला आणि धारदार चाकूने वार करून त्यांची हत्या केली.
मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली ?
हत्या केल्यानंतर आरोपींसमोर पुरावे नष्ट करण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी घरातच बलीरामच्या मृतदेहाचे कटरने तीन तुकडे केले – मुंडके, धड आणि पाय. हे तिन्ही तुकडे वेगवेगळ्या गोण्या व चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
हत्येनंतर सुनिताने यादवनगरमधील घर भाड्याने देऊन मुलांसह घणसोली येथे राहुलसोबत राहायला सुरुवात केली. तब्बल ११ महिने हा गुन्हा त्यांनी पचवला होता.
बालीरामच्या भावाला आला संशय.
बलीराम यांचा भाऊ गावाहून मुंबईत आल्यानंतर त्याने भावाची चौकशी केली. तेव्हा सुनिताने भांडण करून ते घर सोडून गेल्याचे सांगितले. मात्र, सुनिताचे स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्याने एप्रिल २०२६ मध्ये भावाने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या चौकशीत संपूर्ण प्रकरण उघड.
बेपत्ता तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासात आरोपींनी जुने मोबाईल व सिमकार्ड बदलून नवीन हँडसेट वापरल्याचे समोर आले. मात्र, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासणीत राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क होत असल्याचे उघडकीस आले. तसेच, सुनिताच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना वेगळी चौकशी केली.
कडक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचा खुलासा केला.
दोघांना अटक आता पुढील कारवाई काय ?
या प्रकरणी पोलिसांनी सुनिता कुशवाह आणि राहुल प्रजापती यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र, ११ महिने उलटल्याने पुरावे मिळणे आव्हानात्मक ठरणार आहे.















