मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्यावर पदाचा गैरवापर करून हत्या घडवून आणल्याचा आरोप केला. फडणवीसांनाही सल्ला दिला.
बीड, ( मराठवाडा अपडेट 24 ) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वर वाकडे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे वाकडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली आणि मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
‘परळीवाल्याचे गुंड मस्तावले’
जरांगे पाटील म्हणाले, “परळीवाल्याचे गुंड मस्तावले आहेत आणि माजले आहेत. त्यांच्यामुळे वाकडे कुटुंबीयांचे एक लेकरू गेले आहे. त्याला जीवाला मुकावे लागले आहे. तर दुसरे बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत.”
त्यांनी थेट धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत आरोप केला की, “धन्या (एकेरी उल्लेख) पदाचा दुरुपयोग करून हत्या घडवून आणत आहे.” ज्ञानेश्वर वाकडे यांचा खून झाला आणि दुसरा बांधवही मेला पाहिजे, या उद्देशाने मागे साक्षीदार राहू नये – हाच त्या पोलीस निरीक्षकाचा (पीएसआय) उद्देश होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “परळीवाल्याचे ऐकून असा संशय येतो,” असे ते म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप
आंदोलकांनी घटनास्थळी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एका बांधवाला रुग्णालयात नेण्याऐवजी रात्रभर पीआय गाडीत घेऊन फिरतो. पीएसआय १०० टक्के दोषी आहे. त्यांनी काळजी घेतली असती तर खून झाला नसता,” असे जरांगे पाटील म्हणाले. “निरीक्षकाला समजत नाही का की आपण प्रशासनामध्ये आहोत? आरोपींची कसलीही कदर केली नाही पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
फडणवीसांना सल्ला – ‘गुंड सांभाळायचं बंद करा’
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून स्पष्ट सल्ला दिला. “फडणवीस साहेब तुम्ही दहा दुसरे चांगले सांभाळा, पण गुंड सांभाळायचे बंद करा,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे चेतावणी देताना सांगितले की, पोलीस प्रशासन परळीवाल्याचे ऐकून खून असूनही तो अपघात दाखवत असेल आणि पीएम रिपोर्ट खून असल्याचे सांगत असताना पीआय अपघात म्हणत असेल, तर फडणवीस साहेबांची मान खाली घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. “तुमचं नाव बदनाम होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘मोठा उद्रेक होईल’ – जरांगे यांचा इशारा
जरांगे पाटील यांनी पुढे म्हटले की, “लोक सहन करतील तोपर्यंत करतील, पण एके दिवशी खूप मोठा उद्रेक होईल हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यावे.” तसेच पुढच्या काळात वाकडे कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.
जरांगे यांच्या मागण्या
या प्रकरणी जरांगे पाटील यांनी पुढील मागण्या केल्या:
- आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात यावी
- वाकडे कुटुंबीयांना संरक्षण दिले पाहिजे
- कुटुंबीयांना सरकारी वकील देण्यात यावा
- कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक (एसपी) यांची भेट घेऊन सर्व समस्या मांडाव्यात
प्रकरणाची पार्श्वभूमी
उल्लेखनीय म्हणजे, बीड जिल्ह्यातील पट्टीवडगाव येथील २१ वर्षीय ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे याची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी यापूर्वीही धनंजय मुंडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातही त्यांनी मुंडे यांची चौकशी आणि त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती.















