राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाला जोरदार विरोध केला आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांना ‘उपद्रवी’ आणि ‘घाण’ अशी संबोधले. पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली.
मराठवाडा अपडेट 24 : राज्याच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही विद्यमान मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. मात्र, या सर्व चर्चांमध्ये सर्वात चर्चेत असलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांचे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, मात्र आता त्यांच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याला मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण विरोध दर्शविला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याच्या हालचालींवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “तुझं नाव घ्यायला तू कोण लागून गेला? तुझ्या नास्तिकपणामुळे मराठा वंजारी समाजात वैर निर्माण झाले आहे,” असे जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांचाही उल्लेख केला. “तू म्हणशील तसं म्हणायला बापाची पेंड लागली का? अजित पवारांनी लाथ मारून बाहेर काढलं, याला मंत्री पदावर घ्या, मग मराठे अंगावर येतील,” असे त्यांनी टोमणे हाणले. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना ‘उपद्रवी’ आणि ‘घाण’ अशी संबोधले. “धनंजय मुंडे हा उपद्रवी आहे, याचं नाव कोण घेतं? अजित पवारांचा पक्ष गुंडांना सांभाळतो काय? धनंजय मुंडे ही घाण आहे,” असा तीव्र शब्दांत त्यांनी निषेध व्यक्त केला.
पंकजा मुंडे यांच्यावरही टीका
धनंजय मुंडे यांच्यासोबतच जरांगे पाटील यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, जालन्यातील भाजप आमदारांनी त्यांच्याकडे तक्रार केली आहे की पालकमंत्री निधी त्यांच्या नातेवाईकांना दिला जात आहे. “पालकमंत्री सग्या सोयऱ्यांना निधी देतात काय? पंकजा मुंडे जालन्यात परळी पॅटर्न चालवतात काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे यांच्या कार्यशैलीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे अहंकारी आहेत पण खुणशी नाहीत. पंकजा मुंडे यांनी पक्षात सगेसोयरे आणू नये.”
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन लोकशाही मार्गाने चालले आहे. “धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवले पाहिजे. आंदोलन दडपण्याचं काम सरकार पहिल्यापासून करत आहे. आंदोलनाला आमची साथ आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, सोनम वांगचूक यांच्या प्रकरणावर बोलताना त्यांनी म्हटले की, “सोनम वांगचूक यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, सरकारकडून वांगचूक यांना बेदखल करता कामा नये. सरकार विचारांना बेदखल करू शकत नाही.”
राज्यातील सत्तासमीकरणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडी पाहता, जरांगे पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्या पुनरागमनाच्या शक्यतेवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.















