मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकारणातून निवृत्तीच्या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. हत्येचा कट, मराठा-ओबीसी संघर्षासह अनेक गंभीर आरोपांची मालिका.
मराठवाडा अपडेट 24 : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. राज्याच्या पर्यावरण, पशुसंवर्धन व हवामान बदल मंत्री तथा भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना थेट इशारा देत मोठा वाद उफाळून आला आहे.
पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं?
बीड जिल्ह्यातील परळी येथे झालेल्या कवी संमेलनाच्या समारोपप्रसंगी पंकजा मुंडे यांनी भावनिक भूमिका मांडली. बीड-परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, या रस्त्यावर प्रवास करताना त्यांना राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटते. त्या म्हणाल्या, “या रस्त्यावर खडखड करत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं.”
मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून त्यांना नव्याने प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे.” कवी संमेलनात राजकारणावर आधारित कविता ऐकल्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गाच्या उपमा देत सांगितले की, जर राजकारण त्यांच्या विचारांना समरस वाटले नाही, तर त्या राजकारणातून बाहेर पडतील. “जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो, तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर टोलेबाज हल्ला
पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम पंकजा मुंडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर हा (धनंजय मुंडे) सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. वारसाच मोडला मग.” त्यांनी पुढे सांगितले की, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची हिंमत पंकजा मुंडेंकडे आहे. जरांगे म्हणाले, “खूप गरिबीतली जात त्यांनी वर काढलेली आहे आणि या जर बाजूला गेल्या तर ती जात पूर्ण जेलमध्ये घालेल हा, गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल हा.” अशी टीका त्यांनी थेट धनंजय मुंडेंवर केली.
‘माझ्या हत्येच्या कटात शंभर टक्के तू आहेस’ – जरांगेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप करताना स्पष्टपणे सांगितले की, “यापुढे मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मराठ्यांसोबत मारामारी बंद. नाहीतर मी पठ्ठ्या आहे. दोन-तीन वेळा तुला वाचवले आहे. नाहीतर तुला मध्ये घालीन.” त्यांनी पुढे दावा केला की, “माझ्या हत्येच्या कटात शंभर टक्के तू आहेस. मात्र तुला वाचवलेले आहे.”
जरांगे पाटील यांनी औरंगाबाद येथील (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) एका कार्यक्रमात हे आरोप केले. त्यांनी दावा केला की, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शुक्ला यांच्यासोबत बसून त्यांच्या घातपाताचा कट रचला. जरांगे म्हणाले, “तिथे तुला वाचवले, तो सगळा डाटा फडणवीसांकडे आहे. तो कधी पण बाहेर येऊ शकतो, हे मी जबाबदारीने बोलत आहे.”
‘बीडमधली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा म्होरक्याच तो आहे’
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंना इशारा देताना स्पष्ट केले की, “तू पाप करायचं बंद केलं आणि मराठ्यांना त्रास देणं बंद केलं तर काहीतरी होईल. नाहीतर तुझे वाईट दिवस येणार. चांगले दिवस येणार नाहीत.” त्यांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, “बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा म्होरक्याच तो आहे. मराठा आणि ओबीसीमधलं प्रेम तोडायला धन्या कारणीभूत.”
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “तू कितीही खळ्या खंदल्या तरी तुला माती काढू देत नाही.” त्यांनी धनंजय मुंडेंवर जातीपातीचे राजकारण आणण्याचा आरोपही केला.
‘तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय’
जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना उद्देशून सांगितले की, जातीपातीचे राजकारण त्यांनीच आणले. त्यांनी सगळ्याच जातीपातींच्या लोकांचे कार्यक्रम केले. जरांगे म्हणाले, “बलात्कार करणाऱ्याला सांभाळावं लागेल, असं म्हणतो. आता तू पश्चाताप करायला लागला. तुला उशिरा का होईना शहाणपण आलं. बरं झालं.” सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्पष्ट केले की, “तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय. फक्त तुझ्यामुळे”.
पंकजा आणि धनंजय मुंडेंची राजकीय भूमिका
उल्लेखनीय बाब म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांना आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वक्तव्याला फारसे गांभीर्य न देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनीही काही तासांपूर्वीच राजकारणातील गलिच्छ वातावरणामुळे निवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू-भगिनींच्या या वक्तव्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळत धनंजय मुंडेंना लक्ष्य केले.















