marathwada update 24 : देशभरात E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक वाहनमालकांनी या इंधनामुळे आपल्या वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, आता केंद्र सरकारने या विषयावर संसदेत स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत खासदार ए. ए. रहीम यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मोठा दिलासा दिला आहे.
अभ्यासातून काय निष्पन्न?
IOCL, IIP, ARAI आणि SIAM या प्रतिष्ठित संस्थांनी केलेल्या अभ्यासात E20 मुळे वाहनांच्या कार्यक्षमतेत मोठी घट आढळली नाही. BS-VI तसेच बहुतांश जुन्या वाहनांवरही E20 चा गंभीर विपरीत परिणाम दिसून आला नाही. मात्र, 2005 ते 2016 दरम्यानच्या काही BS-III वाहनांमध्ये रबर पार्ट्स व गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते, असे गडकरी यांनी कबूल केले.
मायलेजवर काय परिणाम?
वाहनाच्या मायलेजवर होणारा परिणाम हा केवळ इंधनामुळे नव्हे, तर वाहनाची देखभाल, टायर प्रेशर आणि ड्रायव्हिंग पद्धतीवरही अवलंबून असल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे मायलेज कमी झाल्यास ते केवळ E20 इंधनामुळेच आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल.
नीती आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतर-मंत्रालयीन समितीच्या शिफारशी आणि जून 2021 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रोडमॅप फॉर एथेनॉल ब्लेंडिंग इन इंडिया 2020-25’ या अहवालाच्या आधारे देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे.
आकडेवारी काय सांगते?
भारतामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 2013-14 मध्ये केवळ 1.53 टक्के होते. ते वाढून 2024-25 मध्ये सुमारे 19.2 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या परिवर्तनाचे द्योतक आहे.
केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर E20 पेट्रोलबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या अनेक बाबी तथ्यहीन आहेत. सरकारने इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांची सुरक्षितता यांचा पूर्णपणे विचार करूनच ही धोरणात्मक अंमलबजावणी केली आहे. वापरकर्त्यांनी कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.















