एका परीक्षेत शंभरपैकी नव्वद प्रश्न आधीच व्हॉट्सअॅपवर फिरत असतील तर त्या परीक्षेला परीक्षा तरी म्हणायचं का ? महाराष्ट्रात सध्या हाच प्रश्न लाखो तरुणांच्या मनात घर करून बसला आहे, नीट परीक्षेतील पेपरफुटीचं प्रकरण अजून शांत झालेलं नाही, तोच आता राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या भरती परीक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे? आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही तक्रार कुणा तिसऱ्याने नाही तर स्वतः परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनीच केली आहे, नेमकं काय घडलं ? आता कोणता प्पर लिक झाला आहे ? कोणी आरोप केला आणि आयोगाने काय भूमिका घेतली, हे सगळं सविस्तर वाचा…
FDA च्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह
बावीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवसापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने औषध निरीक्षक या पदासाठी भरती परीक्षा घेतली. हे पद अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित असून राज्यभरात औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्याची जबाबदारी याच अधिकाऱ्यांवर असते. हजारो विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी केली होती. पण परीक्षा पार पडल्यानंतर काही दिवसांतच या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
परीक्षेच्या आधी म्हणजे वीस मार्च रोजी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर ?
परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे वीस मार्च रोजी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर फिरू लागली, असा दावा एका उमेदवाराने केला. या उमेदवाराचं नाव गौरव पाटील असं आहे. त्याने सांगितलं की शंभर प्रश्नांपैकी तब्बल नव्वद प्रश्न आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा आकडा जर खरा असेल तर संपूर्ण परीक्षा प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात येते. सुरुवातीला गौरवने लोकसेवा आयोगाकडे तक्रार केली, पण त्याची दखल घेतली गेली नाही असा त्याचा आरोप आहे. यानंतर त्याने थेट अन्न व औषध प्रशासन विभागाकडे म्हणजेच एफडीएकडे ईमेलद्वारे अधिकृत तक्रार दाखल केली.
फक्त एवढंच नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ऋषिकेश गांगर्डे नावाच्या दुसऱ्या एका उमेदवारानेही असाच गंभीर आरोप केला. परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न आणि संभाव्य उत्तरे पोहोचली होती, असं त्याचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे जेव्हा त्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला असाही आरोप त्याने केला आहे. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उमेदवारांनी सारखेच आरोप केल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं.
तक्रारीची दखल घेत नसल्याचा आरोप
या दोन्ही तक्रारींमध्ये फक्त प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा नाही, तर आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. काही उमेदवारांचे गुण अचानक आणि संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यादी यांच्यात मोठी तफावत असल्याचंही तक्रारदारांचं म्हणणं आहे. म्हणजे एकीकडे प्रश्नपत्रिका आधीच फुटली आणि दुसरीकडे निवड प्रक्रियेतही घोळ झाला, असे दोन्ही आरोप एकत्र आल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनलं आहे. तक्रारदारांनी यासंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची सखोल फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणातला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे आयोगाची प्रतिक्रिया सुरुवातीला तक्रारीची दखल घेतली गेली नाही असा आरोप होत असतानाच, आता एफडीए विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। तक्रारदाराचा जबाब नोंदवून त्याच्याकडील पुरावे ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी हे प्रकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्यात आलं आहे. म्हणजेच प्रशासकीय पातळीवर या तक्रारीची दखल घेतली जात आहे हे स्पष्ट झालं.
पेपर फुटीचा आरोप आयोगाने साफ फेटाळला.
मात्र दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या आरोपांबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. पेपरफुटी झाल्याचा दावा आयोगाने साफ फेटाळून लावला असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। तसंच भरती प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नसल्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मिळालेल्या तक्रारींमधील पडताळणी केली जाईल आणि गरज भासल्यास आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन आयोगाने दिलं आहे. एका बाजूला उमेदवारांचे आरोप आणि दुसऱ्या बाजूला आयोगाचा स्पष्ट नकार, यामुळे नेमकं सत्य काय हे अजून गुलदस्त्यातच आहे.
हे प्रकरण आता फक्त प्रशासकीय पातळीवर राहिलेलं नाही तर त्याला राजकीय रंगही चढला आहे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणावर stetment दिले आहे, हा प्रश्न केवळ एका पेपरचा नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा प्रकार जर खरा ठरला, तर तो केवळ पेपरफुटीचा विषय राहणार नाही, तर संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील जनतेच्या विश्वासालाच मोठा धक्का बसेल असा इशाराही त्यांनी दिला.
तपास प्राथमिक टप्प्यात
एका प्रश्नपत्रिकेमागे फक्त कागद नसतो, तर त्यामागे विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि त्यांच्या पालकांचे कष्ट व त्याग दडलेला असतो, अशी भावनिक बाजूही त्यांनी ओळून दाखवली काही मूठभर लोकांच्या गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ केला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा लढा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात नसून, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दोषी कोणीही असो, त्याला कोणत्याही प्रकारचं राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळू नये, अशी ठाम मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.
आता सद्यस्थिती पाहायची झाली तर हे प्रकरण अजूनही तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आहे. एफडीए विभागाने पुरावे गोळा करून प्रकरण आयोगाकडे सोपवलं आहे, तर आयोगाने चौकशीचं आश्वासन देत आरोप नाकारले आहेत. अद्याप कोणतीही स्वतंत्र किंवा फॉरेन्सिक चौकशी सुरू झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे राज्यभरातील उमेदवार आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी मात्र अस्वस्थ आहेत. नीट पेपरफुटीनंतर टीईटी परीक्षेतही असेच आरोप झाले होते, आणि आता एमपीएससीसारख्या राज्यातील सर्वात विश्वासु मानल्या जाणाऱ्या यंत्रणेवरही असा प्रश्न उभा राहिल्याने विद्यार्थ्यांचा प्रशासकीय परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होताना दिसतो आहे.
काय खरं ? काय खोटं ?
शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एका बाजूला उमेदवार ठोस पुराव्यांसह गंभीर आरोप करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आयोग प्रक्रिया पारदर्शक असल्याचं ठामपणे सांगत आहे. या दोन परस्परविरोधी दाव्यांमध्ये खरं काय आहे हे फक्त चौकशीतूनच समोर येऊ शकतं. पण तोपर्यंत हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आणि त्यांच्या भविष्याचं काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो? तुम्हाला काय वाटतं? अशा संवेदनशील भरती प्रक्रियांमध्ये पूर्ण पारदर्शकता कधी येईल ? की प्रत्येक परीक्षेनंतर असेच वाद होत राहतील ? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, chanel ला suscribe करा















