छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौकात नीट परीक्षेतील अनियमिततेविरोधात मोठे आंदोलन. कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांसह मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणी.
छत्रपती संभाजीनगर : (मराठवाडा अपडेट 24 ) नीट परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमिततेप्रकरणी देशभरातील विद्यार्थी संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौकात विविध राजकीय पक्ष, संघटना आणि वकील संघाच्या वतीने मोठे आंदोलन पार पडले. कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते.
क्रांतीचौकात विद्यार्थ्यांचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांतीचौक हा नेहमीच विविध सामाजिक व राजकीय आंदोलनांचा केंद्रबिंदू राहिला आहे. सोमवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपर लीकप्रकरणी सरकारवर नाराजी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी म्हणाले, “अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, मात्र सरकार दखल घेत नाहीये. सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत.“
दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनिश्चित काळाची उपोषण सुरू केली आहे. सोनम वांगचूक यांच्या आरोग्याची अवस्था बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केले.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौकात विद्यार्थी, पदवीधर तरुण तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी हातात घोषणा फलके घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणी
आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. नीट परीक्षेतील गैरप्रकारांना जबाबदार धरत आंदोलकांनी मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, “नीट पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. सरकार या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत नसल्याने विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. ही परिस्थिती थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आवश्यक आहे.“
अभिजीत दिपके यांच्या वडिलांची प्रतिक्रिया
दरम्यान, अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “सरकार विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. देशभरात विद्यार्थी उपोषण करत आहेत, पण सरकारला त्याची पर्वा नाही. हे विद्यार्थी पाकिस्तानचे नाहीत, तर भारतीय आहेत. सरकारने त्यांच्याशी मानवीय वागणूक द्यावी.“
त्यांनी पुढे सांगितले की, “एका वडिलांच्या नात्याने मला अभिजीतची काळजी वाटते. मी प्रार्थना करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी देईल आणि सरकार आंदोलक विद्यार्थ्यांचे ऐकेल.“
भगवानराव दिपके यांनी असा सवाल केला की, “सरकार कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे? किती लोक मरावेत म्हणजे सरकारला जाणीव होईल?”
















