छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज वितरण पुन्हा खासगी फ्रँचायसीकडे देण्याची शक्यता. ४०% लाइन लॉसेस, अभियंत्यांच्या बदल्या, आणि मुंबईत झालेल्या बैठकांमुळे चर्चेला उधान. जाणून घ्या संपूर्ण बातमी.
छत्रपती संभाजीनगर ( मराठवाडा अपडेट 24 ) : शहरातील वीज वितरण व्यवस्था पुन्हा एकदा खासगी फ्रँचायसीच्या चर्चेत आली आहे. सुमारे ४० टक्क्यांहून अधिक लाइन लॉसेस (तांत्रिक व व्यावसायिक नुकसान) असल्याने महावितरण प्रशासनाकडून या दिशेने विचारविनिमय सुरू झाला आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकांनी या चर्चेला बळ दिले असले, तरी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, अभियंत्यांच्या मोठ्या प्रमाणातील बदल्या आणि गेल्या दोन दशकांपूर्वीचा अयशस्वी प्रयोग लक्षात घेता, या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागाची वीज वितरण कार्यक्षमता सातत्याने घसरत आहे. तांत्रिक अडचणी, चोरीमुळे होणारा वीजचोरीचा धोका, आणि वसुलीतील कमतरता यामुळे लाइन लॉसेसचा आकडा ४० टक्क्यांच्या वर गेला आहे. महावितरणने यापूर्वी शहराचा काही भाग खासगी फ्रँचायसीला दिल्याचा प्रयोग केला होता, परंतु तो अयशस्वी ठरला होता.
महावितरणच्या वरिष्ठ आणि कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या
सध्याच्या चर्चेला बळ देणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अभियंत्यांच्या मोठ्या बदल्या. गेल्या काही दिवसांत महावितरणने अनेक वरिष्ठ आणि कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांना कंपनीकडून नियमित प्रशासकीय कारवाई म्हटले जात असले, तरी तज्ज्ञांच्या मते, खासगी फ्रँचायसीमुळे संरचनात्मक बदलांची तयारी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
महावितरण म्हणताय अफवा आहे.
महावितरणच्या सूत्रांनी या वृत्ताला “अफवा” म्हणून फेटाळले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही सातत्याने वीज वितरणाच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत असतो. मात्र, कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. बदल्या या नियमित प्रक्रियेचा भाग आहेत.” तरीही, प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.















