• Home
  • Beed
  • बीड हत्याप्रकरणाला नवं वळण.. एका महिलेने केला अत्याचाराचा आरोप…

बीड हत्याप्रकरणाला नवं वळण.. एका महिलेने केला अत्याचाराचा आरोप…

बीड हत्या प्रकरण…पीडित महिलेच्या दाव्यांनी संपूर्ण प्रकरण फिरवलं

एका हॉटेलमधलं साधं भांडण सोडवायला गेलेल्या मुलावरच हल्ला होतो त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू होतो. या प्रकरणात खासदाराच्या मुलाचं नाव या जोडलं जातं. आणि अचानक एक महिला समोर येते आणि सांगते की या संपूर्ण हत्येमागचं खरं कारण राजकारण नाही, तर ब्लॅकमेल आणि अत्याचार आहे. बीडच्या या प्रकरणात रोज एक नवा ट्विस्ट येतोय आणि आज जो ट्विस्ट आलाय तो तर सगळ्यांनाच हादरवून सोडणारा आहे. तर आता नका या twist आलाय ? आणि आता या प्रकरणात पुढे काय होणार ? सविस्तर पाहूया या…..

विलास घुले खून प्रकरण काय आहे ?

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातलं टाकळी हे एक गाव. इथे विलास घुले नावाचा तरुण हॉटेल गावकरी चालवत होता. वीस जून दोन हजार सव्वीसच्या रात्री या गावात जे घडलं त्याने अख्खा बीड जिल्हा हलला. हॉटेलमध्ये सुरू झालेलं भांडण मिटवायला गेलेला विलास स्वतःच त्या भांडणाचा बळी ठरला. सुरुवातीला ही घटना म्हणजे दोन गटांमधला एक वाद आहे असे वाटले होते. पण काही तासांतच या प्रकरणाला राजकीय रंग चढला, कारण आरोपींनी एका खासदाराच्या मुलाचं नाव घेतल्याचा दावा झाला. आणि आता एका महिलेच्या एका stetment मुळे या प्रकरणाला नवीन वळण आलंय,

फिर्यादीत मूळ कहाणी काय होती ?

वीस जूनला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेल गावकरीमध्ये उमेश माने आणि आचारी गणेश शुक्ला बसले होते. अचानक तिथे एक पांढरी स्कॉर्पियो येऊन थांबली. त्यातून कदमवाडीचा बाबासाहेब कदम आणि त्याचे आठ नातेवाईक उतरले. त्यांनी थेट उमेश मानेला धरून मारहाण सुरू केली आणि माझ्या बायकोचा नाद का सोडत नाही असं विचारत त्याला बेदम झोडपलं. हे भांडण पाहून हॉटेल मालक विलास घुले आणि त्याचा भाऊ नितीन मध्ये पडले. पण बाबासाहेब कदमने त्यांनाही सोडलं नाही. दहा जण एकावेळी मारहाण करत होते. जीव वाचवण्यासाठी विलास आणि उमेश पळत समर्थ बिअरबारपर्यंत पोहोचले, पण तिथेही त्यांना गाठलं गेलं आणि रामेश्वर गायकवाड नावाच्या आरोपीने खिशातून चाकू काढून विलासच्या पोटात खुपसला. ही फिर्यादीतली मूळ कहाणी होती.

सौरभ सोनवने ने आरोपीला पळून जायला गाडी पुरवल्याचा आरोप..

या हत्येनंतर विलासचा चुलत भाऊ रमेश घुले याने थेट खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं, सौरभ सोनवणेचं नाव घेतलं. आरोपींना पळून जायला गाडी पुरवली, मदत केली असे गंभीर आरोप झाले. हे प्रकरण इतकं चिघळलं की नातेवाईकांनी विलासचा मृतदेह तब्बल नऊ तास केज पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यरात्री फोन करावा लागला, पोलीस अधीक्षकांना लेखी आश्वासन द्यावं लागलं. अखेर नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आणि सहाजणांना अटक करण्यात आली. एसआयटी स्थापन झाली, सौरभ सोनवणेची चार तास चौकशी झाली, पण त्याच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही.

याच काळात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी घुले कुटुंबाची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी तर थेट सवाल केला की एका आरोपीला अटक होत नाही, हा पोलिसांचा लाडका आहे का? राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली असतानाच रविवारी संध्याकाळी गावातून कॅंडल मार्च निघाला आणि नेमक्या त्याच वेळी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला.

विलास घुले खून प्रकरणात महिलेने काय दावा केला ?

एका महिलेने पुढे येऊन धक्कादायक दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार उमेश माने याने तिच्यावर अत्याचार केला, त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केलं. हे सहन न झाल्याने तिने कुटुंबाला सगळं सांगितलं आणि पोलिसांत तक्रार देण्याची तयारी केली. पण याच वेळी विलास घुलेचा भाऊ रमेश घुले मध्ये आला आणि असं पुन्हा होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, पण तक्रार केली तर सोडणार नाही अशी धमकी दिली, असा आरोप या महिलेने केलाय. यानंतर ती कुटुंबासह घर सोडून दुसरीकडे राहायला गेली, पण तिथेही विलास आणि उमेश स्कॉर्पियो आणि बुलेट घेऊन त्रास देत राहिले असा तिचा दावा आहे.

तीन जूनला विलासने तिला धमकी दिली की जुने संबंध परत सुरू केले नाहीत तर नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकेल. वीस जूनला तो पुन्हा तिच्या घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिवीगाळ करायला लागला. नवऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता विलासने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या दाव्यानुसार त्यानंतर तिचे वडील, नवरा आणि नातेवाईक विलासला समजावायला हॉटेलवर गेले असता विलास आणि साथीदारांनी काचेच्या बाटल्या आणि विटांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातून झालेल्या झटापटीत विलासचा मृत्यू झाला, असं तिचं म्हणणं आहे. यासोबतच तिने पोलिसांवरही गंभीर आरोप केला की आधी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता बीड आणि केज पोलिसांनी ती नोंदवूनच घेतली नाही.

एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी वेंकटराम यांनी तपासा बाबत काय सांगितले ?

या नव्या दाव्यांमुळे संपूर्ण प्रकरणाला आता तिसरं वळण मिळालंय. आधी हे साधं भांडण वाटत होतं, मग राजकीय वळण आलं आणि आता थेट लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलचा आरोप समोर आलाय. तपासात आतापर्यंत नसलेल्या एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं, राजकुमार मोरे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसत असला तरी सुरुवातीच्या तक्रारीत त्याचं नाव नव्हतं. एसआयटीने त्याचा शोध घेऊन लातूरमधून त्याला अटक केली, त्यामुळे आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे. आधीच अटक झालेल्या बाबासाहेब आणि संतोष कदम यांची पोलीस कोठडी संपल्यावर न्यायालयाने त्यांना आणखी पाच दिवसांची कोठडी दिली. एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी वेंकटराम यांनी मात्र तपास सुरू असल्याचं सांगत तपशील उघड करण्यास नकार दिला.

या हत्येमागे राजकारण आहे की वासना, सत्ता आहे की सूड, ह्या प्रश्नावर आता बीडच्या प्रत्येक गल्लीत चर्चा होत आहे. आरोप करणारे दोन्ही बाजूचे लोक आपलं म्हणन मांडत आहेत, पण खरं सत्य काय हे फक्त एसआयटीचा तपासच सांगू शकेल. तोपर्यंत या प्रकरणात नक्की कोण पीडित आहे आणि कोण आरोपी, हे ठरवणं इतकं अवघड का होऊन बसलंय? पण तुम्हाला या प्रकरणा बद्दल काय वाटते ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा…

Related Posts

UPI वापरावर शुल्क? ग्राहकांना काय सत्य आहे? जाणून घ्या सर्व काही

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम. जाणून घ्या UPI शुल्काबाबतचे सत्य, लहान व्यापाऱ्यांवर काय परिणाम…

ByByrushikesh Aug 8, 2026

देवगाव रंगारी शाळेत धक्काबुक्कीतून चाकूहल्ला; दहावीच्या विद्यार्थ्याने चार जणांवर केले वार, एक गंभीर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील शाळेत किरकोळ कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने पॉकेट चाकूने चार वर्गमित्रांवर हल्ला केला. एकाची…

ByByrushikesh Aug 8, 2026

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर टोलेबाज हल्ला; कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी बावनकुळेंना नार्को टेस्टचे आव्हान

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र…

ByByrushikesh Aug 8, 2026

सुनील तटकरे यांचं मोठं वक्तव्य; ‘प्रशांत किशोरांची नेमणूक झाली नाही, आम्हाला रणनीतीकारांची गरज नाही’

प्रशांत किशोर-सुनेत्रा पवार भेटीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रणनीतीकारांची गरज नसल्याचं सांगत…

ByByrushikesh Aug 8, 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top